वारकऱ्यांच्या स्वागतासाठी शासन व प्रशासन सज्ज – पालकमंत्री जयकुमार गोरे*

*आषाढी वारी २०२६….*

*वारकऱ्यांच्या स्वागतासाठी शासन व प्रशासन सज्ज – पालकमंत्री जयकुमार गोरे*

*पालखीतळावर जर्मन हँगर, हायमास्ट; वाखरीत मुरमीकरणाचे निर्देश, निधीची तरतूद करणार*

मुख्य संपादक राम गायकवाड

*पंढरपूर, दि. १८:* “आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मानाच्या पालखी सोहळ्यासह सर्व पालख्या, दिंड्या व लाखो वारकरी सोलापूर जिल्ह्यात येत असून त्यांच्या स्वागतासाठी शासन व प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे,” असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील सर्व पालखीतळ व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री बोलत होते. ते म्हणाले, “सर्व पालखीतळ, विसावा ठिकाण, मुक्कामाचे ठिकाण व रिंगणाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी खूप चांगल्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्ह्यात उत्साही व आनंदी वातावरण आहे आणि याच वातावरणात पालख्यांचे स्वागत केले जाणार आहे.”

“वारकऱ्यांनीही आनंदी वातावरणात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घ्यावे. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी प्रशासन चांगले काम करत आहे, त्यामुळे वारकरी समाधानी राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*पावसाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना:*
जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यासंदर्भात पालकमंत्री म्हणाले, “पालखीतळावर पावसामुळे वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप यासह अन्य सर्व प्रकारच्या सुविधा करण्यात आल्या आहेत. भंडी शेगाव सह ज्या पालखीतळावर पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी जिल्हा परिषदेने तात्काळ आणखी हायमास्ट बसवून घ्यावेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध केला जाईल.”

*वाखरी पालखीतळासाठी तातडीचे निर्देश:*
सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश देताना पालकमंत्री गोरे म्हणाले, “वाखरी पालखीतळावर चिखल होणार नाही व पाणी साचणार नाही यासाठी त्वरित मुरमीकरण करून घ्यावे. कामासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक असल्याने तातडीने कार्यवाही करावी. आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करण्यात येईल.

*श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मुक्काम-विसावा ठिकाणांची पाहणी*

आषाढी वारी २०२६ च्या अनुषंगाने दि. १९ जुलै २०२६ रोजी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन होत आहे. पालखी समवेत लाखो वारकरी भाविक पायी येतात. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज धर्मपुरी, पुरंदावडे, नातेपुते, माळशिरस, सदाशिवनगर, वेळापूर व भंडी शेगाव, वाखरी येथील पालखी मुक्काम, विसावा व रिंगणाच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी शासन व प्रशासनाच्या वतीने वारकरी-भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, फिरती शौचालये व पिण्याच्या पाण्याच्या टँकर व्यवस्थेची पालकमंत्र्यांनी माहिती घेतली. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने सर्व ठिकाणी वारकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा तसेच औषधे याचीही माहिती घेतली. त्यांनी प्रत्येक ठिकाणाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातील विविध सुविधांची माहिती त्यांनी घेतली.

पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना पालखी मार्गावर तसेच विसावा, मुक्काम व रिंगणाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही, या दृष्टीने नियुक्त केलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परस्परांत समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना पालकमंत्री गोरे यांनी दिल्या. स्वच्छता, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन व सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यावेळी आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, माळशिरसच्या उपविभागीय अधिकारी विजया पांगरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, तहसीलदार सुरेश शेजुळ, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार, कार्यकारी अभियंता अमित निमकर, सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह संबंधित ठिकाणचे स्थानिक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!