महाराष्ट्र शासनाच्या बॉयलर परीक्षक समितीत आष्टी शुगरचे जनरल मॅनेजर श्री. भागवत मगर यांची निवड….
✍️ सोलापूर प्रतिनिधी : दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक
✍️ महाराष्ट्र शासनामार्फत दि. ३० मार्च २०२६ रोजी घेण्यात आलेल्या बॉयलर प्रचालन इंजिनिअर व बॉयलर परिचर परीक्षेच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या परीक्षक समितीत आष्टी शुगर लिमिटेडचे जनरल मॅनेजर श्री. भागवत मगर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे साखर उद्योग क्षेत्रात तसेच आष्टी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
राज्यातील औद्योगिक क्षेत्रात बॉयलरचे सुरक्षित आणि कार्यक्षम संचालन करण्यासाठी पात्र व प्रशिक्षित तांत्रिक मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून नियमितपणे बॉयलर प्रचालन इंजिनिअर व बॉयलर परिचर परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे नियोजन, मार्गदर्शन व मूल्यमापन पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम पद्धतीने व्हावे यासाठी अनुभवी तज्ज्ञांची परीक्षक समिती गठीत केली जाते. याच समितीत आष्टी शुगरचे जनरल मॅनेजर श्री. भागवत मगर यांना सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे.
श्री. मगर यांना साखर उद्योग तसेच बॉयलर प्रचालन व्यवस्थापन क्षेत्रात अनेक वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. तांत्रिक ज्ञान, व्यवस्थापन कौशल्य आणि कार्यक्षम नेतृत्व यांच्या जोरावर त्यांनी उद्योग क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अभियंते व तांत्रिक कर्मचारी घडले असून उद्योगातील सुरक्षितता, कार्यक्षमता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यास त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
परीक्षक समितीमध्ये त्यांचा समावेश झाल्यामुळे राज्यातील बॉयलर प्रचालन व तांत्रिक प्रशिक्षण प्रक्रियेला अधिक बळ मिळणार असल्याचे मत औद्योगिक क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ परीक्षेच्या प्रक्रियेला होऊन ती अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि परिणामकारक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, आष्टी शुगर लिमिटेडचे अधिकारी, कर्मचारी, साखर उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच आष्टी व परिसरातील नागरिकांनी श्री. भागवत मगर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या निवडीमुळे परिसरातील तरुण अभियंते व तांत्रिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवकांना प्रेरणा मिळाली असून त्यांनी भविष्यातही उद्योग क्षेत्रासाठी उल्लेखनीय कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

