आधारवड हरिभाऊ सुरवसे” : अंकोलीच्या सामाजिक-शैक्षणिक इतिहासाला दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे पुस्तक प्रकाशन उत्साहात…
सोलापूर प्रतिनिधी – दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सहसंपादक.
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली गावाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी आयुष्यभर झटणारे कै. हरिभाऊ दादा सुरवसे यांच्या कार्याची उज्ज्वल परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने कर्मयोगीनी प्रतिष्ठान, अंकोली यांच्या वतीने संपादित ‘आधारवड – आठवणीतील हरिभाऊ दादा सुरवसे’ या पुस्तकाचे प्रकाशन अंकोली येथील भैरवनाथ मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
हे पुस्तक श्री बा. बा. वाघमारे व सौ. मनीषा बाळासाहेब वाघमारे यांनी संकलित-संपादित केले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीचे सदस्य व कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक मा. श्री जे. के. (बापू) जाधव म्हणाले,
“अंकोलीच्या सामाजिक-शैक्षणिक वाटचालीत हरिभाऊंचा सर्वात मोठा आणि अविस्मरणीय वाटा आहे. त्यांचे कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.”
रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण मध्य विभाग निरीक्षक श्री जगदाळे साहेब यांनी भैरवनाथ विद्यालय उभारणीसाठी हरिभाऊंनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे कौतुक केले आणि
“त्यांचे कार्य रयत सेवकांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे,” असे सांगितले.
श्री दत्तात्रय घाडगे यांनी 82 वर्षांच्या मैत्रीतील अनेक हृदयस्पर्शी प्रसंग सांगताना,
“हरिभाऊंसारखा प्रामाणिक आणि आत्मीय मित्र मिळणे ही मोठी संपत्ती आहे,” अशी भावना व्यक्त केली.
माजी सरपंच व स्कूल कमिटी सदस्य श्री सज्जनभाऊ पवार यांनी हरिभाऊंच्या लोकसेवेतील योगदानाची आठवण करून दिली. त्यांनी साहेबराव आबा व अमरसिंग बाबा यांच्यासोबत हरिभाऊंनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे अनेक प्रसंग उपस्थितांसमोर मांडले.
युवा नेते संग्रामभाऊ पवार म्हणाले,
“शाळेच्या बांधकामापासून सर्वसामान्यांना दिलेल्या पाठिंब्यापर्यंत – हरिभाऊंचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.”
सोलापूर जिल्हा परिषद पेणुर गटाचे माजी सदस्य श्री शिवाजीराव सोनवणे सर यांनीही शिक्षण क्षेत्रासाठी हरिभाऊंचे योगदान अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व संयोजक, मोहळ पंचायत समितीचे माजी सभापती आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री बाबासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले,
“हरिभाऊंचे गाव विकासातील योगदान म्हणजे पुढील पिढ्यांना दिशा दाखवणारे मार्गदर्शन आहे.”
उपस्थित मान्यवरांमध्ये
श्री बा. बा. वाघमारे, विजय सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य समाधान सुरवसे, जे. के. जाधव सर (प्राचार्य), माजी मुख्याध्यापक गोरे सर, समाजसेवक मा. शरद खंडागळे यांच्यासह अंकोली व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
