शेतकरीभिमुख नाविन्यपूर्ण उपक्रम कृषी विज्ञान केंद्राने राबवावेत : श्रीमती वर्षा लड्डा उंटवाल.
सोलापूर / प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप, सहसंपादक संविधान न्यूज चॅनल. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालक श्रीमती वर्षा लड्डा उंटवाल यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ येथे भेट देऊन केंद्राच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून त्या सोडवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने प्रभावी संशोधन व प्रायोगिक प्रकल्प हाती घ्यावेत, असे सांगताना त्यांनी शासनाला नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करण्याचे आवाहन केले. “शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी नाविन्यपूर्ण अवजारे, सुधारित बियाणे किंवा पीकप्रकारांवर संशोधन आवश्यक आहे. विद्यापीठांनी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्य एकत्रितपणे समन्वयाने केल्यास राज्यातील शेतीला निश्चितच मोठा लाभ होईल,” असे त्या म्हणाल्या.
त्यांनी कृषी विज्ञान केंद्राला नैसर्गिक शेतीचे मॉडेल तयार करून शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक सादर करण्याचे सूचनाही केली.

या भेटीवेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. यशवंत साळे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ व सहयोगी संशोधन संचालक डॉ. नितीन कुमार रणशूर उपस्थित होते. त्यांनी कृषी विज्ञान केंद्रात राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेतली.
कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे यांनी सद्यस्थितीत राबवले जाणारे प्रकल्प व केंद्राच्या एकूण कार्याचा आढावा सादरीकरणाद्वारे दिला.
महासंचालक श्रीमती लड्डा उंटवाल यांनी केंद्राच्या कामाचा गौरव करत शेतकऱ्यांच्या शेतावर सीड हब अंतर्गत बीज उत्पादन कार्याची माहितीही घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विशाल वैरागर, तर आभार प्रदर्शन श्रीमती काजल म्हात्रे यांनी केले.
या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
