सातासमुद्रापार दुमदुमला “जय भवानी-जय शिवाजी”चा नाद

🌍 सातासमुद्रापार दुमदुमला “जय भवानी-जय शिवाजी”चा नाद

श्रीगोंदा तालुक्यातील युवकांनी रशियात उंचावला मराठी संस्कृतीचा झेंडा

अहिल्यानगर / श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी – श्री. अनिल बाळासाहेब पठारे

रशियातील प्रतिष्ठित Kemerovo State University येथे शिक्षण घेत असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने साजरी करत परदेशातही मराठी संस्कृतीचा अभिमानाने झेंडा फडकावला. सातासमुद्रापार असतानाही आपल्या मातृभूमीच्या इतिहास, परंपरा आणि संस्कृतीशी नाळ जपणाऱ्या या विद्यार्थ्यांनी एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, तसेच रशियन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले आणि त्या वातावरणात उपस्थित सर्वांनाच मराठी अस्मितेचा अभिमान जाणवला.

महाराष्ट्रातील Pune, Ahilyanagar, Satara, Kolhapur आदी विविध जिल्ह्यांतून वैद्यकीय व उच्च शिक्षणासाठी रशियात आलेल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती. सर्वांनी पारंपरिक मराठी पोशाख परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मुलींनी नऊवारी साडी, तर मुलांनी पारंपरिक फेटा परिधान करून शिवकालीन वातावरण साकारले.

कार्यक्रमात शिवकालीन इतिहासावर आधारित माहितीपर सादरीकरण करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी मराठीतून शिवरायांच्या शौर्यगाथा मांडल्या, तर रशियन विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा गौरव केला. यामुळे भारतीय इतिहासाबद्दल परदेशी विद्यार्थ्यांमध्येही उत्सुकता आणि आदर निर्माण झाल्याचे दिसून आले.

म्हसे (ता. श्रीगोंदा) येथील डॉ. दिगंबर मोहरे यांचे चिरंजीव आर्यन मोहरे यांनी स्वराज्य स्थापनेचा इतिहास, गनिमी काव्याची रणनीती, प्रशासनातील पारदर्शकता आणि स्त्रीसन्मानाचे धोरण याविषयी प्रभावी भाषण केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या विचारांचे आधुनिक संदर्भात महत्त्व स्पष्ट करताना राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि संस्कृती जपण्याची गरज अधोरेखित केली. परदेशात शिक्षण घेत असतानाही आपल्या मुळांशी नाते घट्ट ठेवण्याचा आणि मराठी संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

हा कार्यक्रम केवळ जयंतीपुरता मर्यादित न राहता मराठी एकात्मता, संस्कृतीप्रेम आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश देणारा ठरला. श्रीगोंदा तालुक्यातील युवकांनी रशियात मराठी अस्मिता जपून महाराष्ट्राचे नाव उंचावले असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

@मुख्य संपादक : राम गायकवाड

@संविधान न्यूज चॅनल व पोर्टल

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *