पंढरपूर (दि. 27 ऑक्टोबर) — येत्या २ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूरमध्ये लाखो वारकरी भाविकांचा ओघ अपेक्षित आहे. यानिमित्ताने प्रशासन, मंदिर समिती आणि विभागीय अधिकाऱ्यांची तयारी बैठक आज झाली.
बैठकीत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की,
यात्रा काळात स्वच्छतेला आणि भाविकांच्या सुलभ दर्शनाला प्राधान्य द्यावे. चंद्रभागा नदीपात्र व वाळवंट परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जास्तीचे स्वच्छता कर्मचारी नियुक्त करावेत.”
सरनाईक यांनी पुढे सांगितले की —
प्रदक्षिणा मार्गावर अनवाणी चालणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कचकडी आणि खडी न टाकता गुळगुळीत रोलिंग करावी.
लाऊडस्पीकरचा वापर टाळावा, वापर झाल्यास पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी.
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी १०५० बसेसची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व बसेस सुस्थितीत ठेवाव्यात.
पंढरपूर शहर व परिसरातील खड्डे बुजविण्याचे काम महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ पूर्ण करावे.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बैठकीत सांगितले की,
“जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांनाही शासकीय महापूजेच्या वेळी मान मिळावा.”
तसेच त्यांनी पुढील सूचना दिल्या —
भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय व औषधसाठा मुबलक ठेवावा.
नदीपातळी नियंत्रित ठेवणे, वाळवंटात तात्पुरती स्वच्छता व प्रकाशव्यवस्था राखावी.
चंद्रभागा वाळवंट कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी शासनस्तरावर नियोजन करण्याची घोषणाही केली.
स्थानिक आमदार आणि संतमहंतांचे सुचवलेले मुद्दे:
आमदार समाधान आवताडे यांनी दर्शनरांगेतील पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना, तसेच AI टेक्नॉलॉजीद्वारे गर्दी नियंत्रण सुचवले.
आमदार अभिजीत पाटील यांनी जनावरांचा बाजार व स्वच्छता याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना केली.
ह.भ.प. जळगावकर महाराज आणि राणा महाराज वासकर यांनी प्रदक्षिणा मार्ग स्वच्छ ठेवावा, स्पीकर वापर टाळावा, अशी मागणी केली.
वारकरी परंपरेला आधुनिक नियोजनाची जोड देत ‘स्वच्छ, सुरक्षित आणि भक्तिमय कार्तिकी वारी’ या उद्दिष्टासाठी प्रशासन सज्ज होत असल्याचे बैठकीत दिसून आले.
